Blog 
मुखपृष्ठ » लोकसत्ता » चतुरंग » आयुर्वेदाच्या स्मृतीतून » पाणी

मुखपृष्ठ » लोकसत्ता » चतुरंग » आयुर्वेदाच्या स्मृतीतून » पाणी

पाणी घेतल्याने सकाळी पोटही छान साफ होते. असे त्यांनीच मला सांगितले.

काही दिवसांपूर्वी एक रुग्ण चिकित्सालयात आले होते. त्यांना अपचनाचा त्रास होता. भूक मंदावली होती. सतत ढेकर येत असत. अधिक विचारले तेव्हा लक्षात आले की ते रोज सकाळी दोन लिटर पाणी उपाशीपोटी घेतात. कोणी तरी तसा सल्ला दिला म्हणून. अनेक दिवसांपासून घेत आहेत, काहीही त्रास नाही, उलट फ्रेश वाटते, असे त्यांचे म्हणणे. पाणी घेतल्याने सकाळी पोटही छान साफ होते. असे त्यांनीच मला सांगितले. आजकाल फक्त अपचनाचा त्रास जाणवतो. बाकी काही नाही. याच प्रकारे अनेक रुग्ण येतात. त्यांच्या पाणी पिण्याच्या सवयीसुद्धा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे त्यांना होणारे त्रास पण वेगवेगळे असतात, पण गंमत म्हणजे त्यांना हे त्रास ते चुकीच्या पद्धतीने पाणी पीत आहेत म्हणून होत आहेत असे बिलकूल वाटत नाही.

आजकाल वजन वाढलेले, सर्दीने त्रस्त, सतत अपचन होणारे, पोट साफ न होणारे, डोकेदुखीचा त्रास असणारे, मधुमेह झालेले, मूळव्याध झालेले, पित्ताचा त्रास असणारे, शांत झोप न लागणारे, सर्दीतून खोकला मग दमा नंतर निमोनिया झालेले असे कित्येक रुग्ण हे चुकीच्या प्रकारे पाणी प्यायल्याने निर्माण झालेले आढळतात. कोणी सकाळी गरम पाणी घेतात, कोणी गरम पाणी व मध घेतात, कोणी ब्रश न करताच घेतात तर कोणी रात्रभर तांब्याच्या भांडय़ात ठेवलेले पाणी सकाळी उठून घेतात. कोणी जेवणाच्या पूर्वी घेतात, कोणी जेवणामध्ये घेतात तर कोणी जेवण पूर्ण झाल्याशिवाय पाणीच पीत नाहीत. आजकाल सगळीकडेच भरपूर पाणी प्या, असे एक  मत डॉक्टर मंडळींकडून ऐकायला मिळत आहे. लोकांमध्ये पाणी कसे प्यावे याबद्दल संभ्रम निर्माण झालेला दिसत आहे. म्हणून तर आयुर्वेदशास्त्र याबद्दल काय म्हणत आहे, हे तुमच्या किंवा माझ्या मतापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. कारण हजारो वर्षांपूर्वी सर्व प्रकारच्या व्यक्ती आणि त्यांच्या प्रकृती लक्षात घेऊन पाणी कसे प्यावे याचे काही नियम आयुर्वेदात घालून दिले आहेत. आयुर्वेदाचे मत हे व्यक्तिसापेक्ष बदलते. त्यामुळे कोणतेही ऐकीव मत आयुर्वेद सांगत नाही. भरपूर पाणी प्या, असे तर मुळीच सांगत नाही. तुमच्या गरजेनुसार, प्रकृतीनुसार, ऋतूनुसार, वयानुसार, देशानुसार, काळानुसार, अग्नीनुसार, पचनशक्तीनुसार, आहारानुसार, व्यवसायानुसार पाणी कसे प्यावे हे आयुर्वेद सांगतो. आयुर्वेदात पाण्याचेही प्रकार सांगितले आहेत. पचायला जड पाणी, हलके पाणी असेही वर्णन मिळते. त्याचबरोबर विहिरीचे पाणी, झऱ्याचे पाणी, नदीचे पाणी, समुद्राचे पाणी, पावसाचे पाणी अशा प्रकारे पाण्याच्या प्रत्येक प्रकारचे वर्णन आलेले आहे. आपण बोली भाषेतसुद्धा हा बारा गावचे पाणी प्यायलेला आहे असे म्हणतो. अशी माणसे क्वचित आजारी पडताना दिसतात. कारण त्यांना सगळीकडचे पाणी पचवायची सवय झालेली असते. म्हणजेच पाण्याचेही पचन व्हावे लागते, हे आयुर्वेदाचे मत आहे. प्रत्येक प्रकारातील पाणी प्रत्येकालाच पचेल असे नाही. आजकाल माझ्याकडे आर. ओ. च्या पाण्याची, विकतच्या पाण्याच्या बाटल्यांची सवय व्यसनाप्रमाणे लागलेले रुग्णसुद्धा येत आहेत. ते पाणी प्यायल्याशिवाय यांचे पोटच साफ होत नाही. लोकांना असे वाटते की भरपूर पाणी प्यायल्याने शरीर स्वच्छ होते. मला सांगा शरीर काय फ्लश केल्यासारखे साफ होणार आहे का? आपल्या किडनीमध्ये काही पाण्याच्या पाइपलाइन गेलेल्या आहेत का? नाही ना? मग? तुम्ही घेतलेल्या पाण्याच्या प्रत्येक घोटाला पचनसंस्थेतून जावे लागते. त्यावर अग्निसंस्कार होतो. त्यामुळे सकाळी उपाशीपोटी घेतलेले अतिप्रमाणातील पाणी जठराग्नीला विझवून टाकते. मग हळूहळू अग्निमांद्य होते व भूक मंदावते. मग पोटाच्या तक्रारी सुरू होतात. मग लोक म्हणतात, आम्ही तर गरम पाणी पितो. अहो पण गरम पाणी चुलीत ओतले तरी चूल विझतेच ना? तसेच जास्त प्रमाणात गरम पाणी उपाशीपोटी प्यायलो तरी अग्निमांद्य होते. इथे आक्षेप जास्त प्रमाणात घेतलेल्या पाण्याला आहे. अती तिथे माती. कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात घेतली तर ती त्रासदायकच ठरणार, मग ते पाणी का असेना. आपण स्वस्थवृत्ताचे सर्व नियम पालन करीत नाही आणि चुकीच्या प्रकारे अर्धवट नियम पाळतो म्हणून असे होते.

लक्षात ठेवा योग्य प्रमाणात घेतलेले पाणी आपल्या शरीरातील अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवते तर अयोग्य प्रमाणात घेतलेले पाणी हे नको असलेले आजारसुद्धा मागे लावते. म्हणून पाणी कसे प्यावे हे आयुर्वेद शास्रोक्त आपण पुढील भागात जाणून घेऊ.

You may also like